हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व इतर सवलती जाहीर करण्याबाबत.
कार्यकारी संपादक - नागेश चव्हाण

प्रति,
मा. जिल्हाधिकारी साहेब,
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली.
विषय : हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व इतर सवलती जाहीर करण्याबाबत.
महोदय,
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण 33% अत्यल्प असून अनेक भागात पावसाने मोठी दडी मारली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद तसेच इतर पिके सुकून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करून पेरणी, बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्च केला आहे. मात्र पिकांना आवश्यक पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालली आहे.
हिंगोली जिल्हा हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेला जिल्हा आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान म्हणजे शेतकरी कुटुंबांच्या संपूर्ण आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होय. सध्याची परिस्थिती पाहता अनेक गावांमध्ये पिके वाचण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने केवळ पंचनाम्याची प्रतीक्षा न करता तातडीने प्रत्यक्ष परिस्थितीचा सर्वेक्षण करून दुष्काळी परिस्थितीची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आमची शासनाकडे ठाम मागणी आहे.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी. पीक विमा कंपन्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन वीजबिल, महसूल व इतर शासकीय देयकांबाबत आवश्यक सवलती द्याव्यात.
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात तातडीची आर्थिक मदत व दुष्काळी अनुदान देण्यात यावे.
सर्व नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चित करावी.
पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा भरपाई मिळण्यासाठी विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत.
शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देऊन आवश्यक कर्ज पुनर्गठनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठांसाठी विशेष मदत उपलब्ध करून द्यावी.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा तातडीने लाभ द्यावा.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या हातात पीक उरलेले नसताना त्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे या निवेदनाची तातडीने दखल घेऊन हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
शशिकांत पुरुषोत्तम देशमुख
जिल्हा सचिव
विलास काळे
प्रदेश कोषध्यक्ष
रवी सूर्यवंशी
जिल्हा उपाध्यक्ष
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य
प्रति
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा. कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य,



